Wednesday, October 24, 2007

तुझ्याशी बोलतो तेव्हा ...

तुझ्याशी बोलतो तेव्हा ...
कंठ दाटून येतो, डोळे भरुन येतात
पण ते सर्व मी सावरतो
कारण?
कारण ... मला तुझ्याबरोबर
संवाद साधण्यासाठी मिळालेले
ते मोजके क्षण ..... अजिबात गमवायचे नसतात
खरंच तुझ्या आठवणी म्हणजे
माझ्यासाठी किती मोठा आधार आहेत
जणू माझ्या हृदयाची स्पंदनेच ...
तुझ्या आठवणी तर मला
तू प्रत्यक्षात समोर उभी असल्याचा साक्षात्कार करुन देतात ...
नकळतच डोळे पाणावतात
आसवे बांध तोडून वाहतात
तेव्हा तर मी तुझ्या मिठीतच असतो ...आणि
विरहाने तडफडणारं मन जणू
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजून जातं ...
- सागर (१०-०१-२००५)

Tuesday, October 9, 2007

ती जेव्हा माझ्या आयुष्यात आली ...

ती जेव्हा माझ्या आयुष्यात आली ...
वादळाप्रमाणे आली अन्
वादळाप्रमाणे गेली ...

आजही ती जेव्हा दिसते,
माझं चित्त विचलित होतं
तिच्या अपेक्षेने मन् रोमांचित होतं...
मन अपेक्षा करणं सोडून देतं,
जेव्हा ती अप्राप्य आहे हे कळतं...
कारण...कधीतरी माझं तिच्यावर प्रेम होतं ...

खरं तर प्रेम आजही आहे.
पण तिला हे समजणार कसं?
अन् मला हे तिला सांगणं जमणार कसं?

हे तर सहजच शक्य आहे,
समाजाच्या भिंती प्रेमात पार करणं
आणि एकमेकांत गुंतुन जाणं
पण हे तुला शक्य आहे का?
सामाजिक हितसंबंध जपणं
अन् माझ्यावर प्रेम करणं ...

तुझं प्रेम मिळवण्यासाठी तू म्हणशील ते करायला मी तयार आहे.
सध्या तरी तुझ्या प्रतिसादाची वाट बघणं एवढंच हातात आहे...
देशील का उत्तर........

- सागर

खास तुझ्यासाठी...

खास तुझ्यासाठी लिहावं असं कधी वाटलं नाही
प्रेमाने तू जवळ करावं असं कधी वाटलं नाही

मनातील भाव क्षणभर थबकले
हृदयातील शब्द कागदावर ओघळले
तुझ्या प्रीतीचे कवडसे मनावर उमटले
तरी तुला भान हरपून पहावंसं वाटलं नाही

काजळ रात्रीतही प्रेम तुझे उजळले
माझ्या अंतरीच्या काठास स्पर्शून गेले
तुझे प्रेम माझ्या ओंजळीत भरलेले
तरी तुला ते हृदयात ओतावंसं वाटलं नाही

तरी याचा खेद नाही, खंत वाटली नाही
मी तुझ्यासाठी तडफडणं, या शिवाय आता काही उरलं नाही ...

- सागर

सोनपरी

सोनपरीची स्वप्ने पाहता पाहता
बालपण उडून गेले
तो थोडा मोठा झाला...
सोनपरीची definition थोडी बदलली...
बालपणी हवे ते खेळणे देणारी सोनपरी
आता मनाला प्रेमाने झंकारणारी स्वप्नपरी झाली ..

तिला न उमगले हे
न कळले त्याच्या मनातील गुपित तिला ...
परि भेटी-गाठी त्यांच्या होतच असे नेहमीप्रमाणे ...
कधीतरी तिला उमगेल हे या आशेपोटी
दिवस जात होते
कसे तिला सांगावे यासाठी
तासन् तास चांदण्यांशी हितगुज होत असे.
स्वत:शीच बोलताना, हातवारे करताना
त्याला एक आगळेच समाधान लाभत असे...
स्वप्नांतील सोनपरीला propose करण्यासाठीचे ते नियोजन असे

अशीच वर्षे गेली...
तिचे लग्नही झाले...मूलही झाले...
तरी सोनपरीच्या विश्वातून त्याला बाहेर येता येत नव्हते...
शेवटी एकदा तो दिवस आला...
धीर करुन त्याने सोनपरीला विचारले,
प्रेम आहे माझे तुझ्यावर....होशील का माझी...
तुझ्याशिवाय मला जगणे अशक्य आहे...

सोनपरी मात्र सैरभैर झाली...
मनातच म्हणाली....वेड्या याच दिवसाची वाट पहात होते मी...
ती आनंदाची तेजस्वी झालेली भावना....एका क्षणातच विझून गेली...
काय करावे तिने...
दोन टोके समोर
एकीकडे स्वत:चा संसार.....
तर दुसरीकडे स्वप्नांतिल अवघाचि संसार ....
दोन टोके समांतर असती तर?????
ह्याच विचारात सोनपरी गढून गेली....
एका सोनपरीची प्रेमकथा विझून गेली....


तुम्ही मात्र जागे व्हा...आपल्या सोनपरीची प्रेमकथा जिवंत ठेवा....
- सागर

आपल्या मैत्रीचे भावबंध

तुझ्या आठवणी मी खूप जपून ठेवणार आहे
कारण, तुझ्या बाबतीत
मी फारच हळूवार भावनांत गुंतलो आहे

आपल्या मैत्रीचे भावबंध,
आयुष्यभर टिकावेत अशी आपली इच्छा होती
पण, सर्वच इच्छा पूर्ण होण्यासाठी नसतात
परिस्थिती,
खरंच, कधी कधी खूप घात करते ती,
आपल्या भावनांचा, आपल्या अपेक्षांचा, आपल्या स्वप्नांचा

भावनांना सावरणं, हे तर तूच मला शिकवलंस
इतरांबाबत मी तर माझ्या भावना सावरल्या
पण तुझ्याच बाबतीत मी त्यांना कसा सावरु?

तरीदेखील मी माझ्या भावनांना सावरणार आहे
कारण मी त्यांना सावरलं नाही तर तो
तुझ्या-माझ्या मैत्रीचा अपमान होईल

एकमेकांना समजून घेणं, हाच
आपल्या मैत्रीतील खरा भावबंध
एकमेकांपासून दूर राहुनही हे
भावबंध आपल्याला जपायचे आहेत
कितीही हृदय भरुन आले तरी
मला तुझ्या आठवणी जपायच्या आहेत.


- सागर

स्वप्ने जोडून ...

स्वप्ने जोडून रस्ता केला
तरी तुझ्यापर्यंत पोहोचलोच नाही

तुझ्यावर कितीही विश्वास ठेवला
तरी भविष्याचा विचारच केला नाही

पाहिले माझ्या एकाकी प्रेमाला
तरी सहानुभूती मिळालीच नाही

तुझा प्रश्न विचारतो मी मला
तरी त्याचे उत्तर मला सापडलेच नाही

सावरता आले नाही मला भावनेला
तरी रडण्यासाठी अश्रू सापडलेच नाही

आशावाद दिलासा देतो मनाला
तरी सावरावयां वेळ मिळालाच नाही

जरी तुझी अपेक्षा मनाला
तरी परमेश्वराला दया आलीच नाही ...


- सागर

प्रेमिकेचा प्रेमभंग ...

पुष्पमालेंतील फुलांसम
प्रेम मी गुंफले
तू,
आधाराला दिलेल्या
विश्वासाच्या पाय-यांवर
नि:शंकपणे चढले
आणि आता
त्या पाय-याच तू काढून घेतल्यास
तूच सांग
कडेलोटाशिवाय
दुसरा पर्याय
माझ्यासमोर
उरतोच कुठे?


- सागर

तो आला ...

तो आला अन्
सपासप
तिच्या हृदयावर घाव घालून
निघून गेला
खेळ अवघा
घडी दो घडीचा
पण
स्वत:चं फाटलेलं हृदय
त्याने केलेला आघात
क्रूरपणे का होईना, पण
त्याने दिलेली निशाणी
सारं....सारं
तिला सांभाळायचं होतं
आणि हो
आणखी एक तिला सांभाळायचं होतं
ज्याच्या खांद्यावर
विश्वासानं मान ठेवली
त्यानंच ती छाटून टाकण्याचं दु:ख ...

- सागर

झेप ...

आकाशात झेप घेताना
पक्षीही अनोळखी असतो
सर्वांपेक्षा उच्च स्थानी असल्याच्या
आनंदापासून ...
त्या उच्च स्थानाबद्दल
माझ्या मनातही
उत्सुकता आहे,
कल्पना झेप घेत आहेत,
त्या उच्च स्थानी
पोहोचण्यासाठी ...
आत्ता होत आहे
तशीच जाणीव मला
त्या स्थानीही जाणवेल का?
सर्व जगापेक्षा आपण वेगळे असल्याची...
पण त्यासाठी एकच करायला हवं
झेप घ्यायला हवी
झेप ...


- सागर

त्या तिथे ...

त्या तिथे,
तू नसतानाही मला तुझं अस्तित्त्व जाणवतं
तुझी अपेक्षा,
मनाला असतानाही तुझ्या आठवणींत ते हरवतं
काही काळाने,
दुर्लभच होणार आहे मला तुझं दिसणं
तुझी वेदना,
तुझ्या डोळ्यांत पाहताना माझं मन कळवळतं
तुझे नसणे,
याचाच अर्थ तुझं दु:ख पाहायला माझे डोळे नसणं
तुला विसरतां,
न येणं यासारखी असह्य वेदना सहन करणं
तू नसताना,
एकच गोष्ट मी करेन - आठवणी जपणं
आणि तू...?
एकच कर ...
माझ्या आयुष्यात परत उगवणं ...


- सागर

मृगजळ

माझ्या जीवनाच्या रखरखीत वाळवंटात
तुझ्या रुपाने पाणी दिसले होते
तहान माझी अफाट होती जरी
तरी एका गोष्टीचे भान मला विसरायला झाले होते
तू म्हणजे माझी तहान भागवणारे
पाणी नसून एक मृगजळच आहेस

वाळवंटात पाण्यावाचून तडफडणारा देखील
समोर पाणी नाहिये हे
माहीत असूनही मृगजळामागे धावत असतो
तेच माझ्याबाबतीत घडू पाहतंय
तू माझी होणार नसलीस, तरीही
तुझी तहान लागलेला मी
तुझ्याऎवजी तुझ्या प्रतिबिंबावर - मृगजळावरच
समाधान मानून घेणार आहे

कारण मृगजळामागे धावता धावता
तहानेने व्याकुळ झालेल्याला
अचानक पाणी मिळून तो तृप्त होतो
कदाचित् तेच माझ्याबाबतीतही घडू शकेल ...
म्हणूनच मी या मृगजळामागे धावणार आहे....


- सागर

पुन्हा एकदा मला रडू दे

पुन्हा एकदा मला रडू दे, पुन्हा एकदा मला रडू दे
तुझ्या प्रेमाची आठवण काढताना, पुन्हा एकदा मला रडू दे

तुझं हसताना गालाला खळी पडणं
अन् ते मी बेभानपणे पाहणं
फिरुन एकदा मला ते पाहू दे
पुन्हा एकदा मला रडू दे

तुझं ते देवाच्या पाया पडणं
आपलं प्रेम अक्षत राहावे हे मागणं
फिरुन एकदा मला ते मागू दे
पुन्हा एकदा मला रडू दे

तुझे ते डोळे वार्र्यानं फडफडणं
अन् मी त्यांत फुंकर मारणं
फिरुन एकदा मला ते करु दे
पुन्हा एकदा मला रडू दे

तू जाताना वळूनही न बघणं
माझ्या प्रेमाला नकार देणं
फिरुन एकदा हृदयाला भग्न होऊ दे
त्यासाठी तरी पुन्हा एकदा मला रडू दे


- सागर

लक्ष्मीची पाऊले

आज मला पौर्णिमेच्या त्या पूर्णचंद्राची,
प्रकर्षाने आठवण येतेय
कारण आपल्या शीतलतेने तो
सर्व धरणी आल्हादित करतो

अन् त्या पूर्णचंद्राची शीतलता
कोणा भाग्यवंताच्या जीवनात
लक्ष्मीची पावलांनी प्रवेश करणार आहे
एका क्षितीजावर सुर्योदय होणार आहे

लक्ष्मी मात्र शांत आहे, उदास आहे
लक्ष्मीच्या तेजात, तिच्या भावना दिसत नाहित
पण गृहप्रवेश करताना, लक्ष्मीने
हसतमुख असावं, प्रसन्न असावं

एकदा गृहप्रवेश केल्यावर मात्र लक्ष्मीने,
आपल्या घराच्या सुखसमृद्धीचाच ध्यास घ्यावा
मेणबत्ती स्वत:जळून प्रकाश देते
चंद्र न जळता प्रकाश देतो

हे लक्ष्मीनंच ठरवायचं की,
प्रकाश मेणबत्तीसारखा द्यायचा की चंद्रासारखा?

- सागर

जटायू ...

मावळत्या सूर्यानंतर
उगवता सूर्य
रंगीबेरंगी, प्रसन्न अशी
पहाट घेऊन येत असतो
केवळ याच भरंवशावर
राहीलो मी

अन् त्याचमुळे
आज मला जटायू पक्ष्याप्रमाणे
हतबल व्हावे लागले आहे

आपल्या पडत्या काळात
माणसाला शांत बसावे लागते
लोक म्हणतील ते ऎकून घ्यावे लागते
त्याप्रमाणेच आज मी ही शांत आहे
का काहीतरी करण्याची हिम्मत माझ्यात नाही?

पण एक सत्य मात्र आज
मी पूर्णपणे अनुभवलंय
स्वत: प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय
भाग्य आपल्याला सन्मुख होत नाही
आणि म्हणूनच त्या रंगीबेरंगी, प्रसन्न अशा
पहाटेची अन् सर्व दिशांवर ठसा उमटविणा-या
उगवत्या सूर्याची वाट पहाण्यात
आता काही अर्थ नाही, हा विचार
मनी रुजत चालला आहे
आणि राखेतून भरारी मारणा-या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे
मलाही नवे पंख फुटू लागले आहेत
- सागर

सागर तरंग

सागर तरंग

"कवितेतून व्यक्त मी,
अव्यक्त होतो कधी कधी
ब्लॉगच्या माध्यमातून प्रकटतो,
लुप्त होतो कधी कधी"


या ब्लॉगवर माझ्या स्वतःच्या कविता देत आहे. खरेतर या सगळ्या कविता मी माझ्या समाधानासाठीच लिहिल्या होत्या. पण कुठेतरी असे वाटले की कदाचित् आपली मनस्थिती या जगातल्या हजारो-लाखोंसारखी असू शकते. तेव्हा हा ब्लॉग म्हणजे माझ्या भावना तुम्हा सर्वांबरोबर वाटून घेण्यासाठीच आहे. दु:ख वाटून घेतल्याने दु:खाचा बहर कमी होते आणि सुख वाटून घेतल्याने सुखाचा आनंद शत-गुणित होतो असे म्हणतात तद्वतच ह्या कविता तुमच्याबरोबर वाटून घेताना मनापासून समाधान होत आहे

- सागर